नवी दिल्ली : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे. यामध्ये कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय देण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच १५ फेब्रुवारीपर्यंत नार्वेकरांनी निर्णय घ्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं त्यांना दिले आहेत. यामुळं मात्र शिवसेनेसारखाच राष्ट्रवादीचा निर्णय येऊ शकतो असंही तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.
सुप्रीम कोर्टात काय झाल्या घडामोडी
सुप्रीम कोर्टात आज सुनावणीदरम्यान राहुल नार्वेकर यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला. यावर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी यावर आक्षेप घेत नार्वेकरांचं अशी चालढकल करणं नेहमीचंच असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं त्यांना केवळ एक आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा अशी विनंती कोर्टाला केली.
नार्वेकरांचे वकील तुषार मेहता यांनी कोर्टाला अशी हमी दिली की ३१ जानेवारीला ही सुनावणी पूर्णपणे बंद होईल आणि निकाल राखून ठेवला जाईल. फक्त त्यांना हा निकाल लिहिण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ हवा आहे. पण यामध्ये अॅड. सिंघवींनी त्यांना एक आठवड्याचाच वेळ देण्याची मागणी केली. पण सुप्रीम कोर्टात त्यांना १५ दिवसांचा वेळ दिला. त्यानुसार आता जो निकाल ३१ जानेवारीपर्यंत येणं अपेक्षित होत तो आता लांबणवीर पडून १५ फेब्रुवारीला देण्यात येणार आहे.
वेळ वाढवून दिल्यानं शिवसेनेसारखाच निकाल येणार?
सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांना १५ दिवसांचा वेळ वाढवून दिल्यानं आता शिवसेनेप्रमाणंच राष्ट्रवादीचा निकाल येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा निवडणूक आयोगाचा निकाल अजून येणं अपेक्षित आहे.
त्यामुळं जर या पंधरा दिवसात निवडणूक आयोगानं निकाल दिला. तर त्याच निकालाच्या आधारे नार्वेकर राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रा प्रकरणावर आपला निकाल देतील. कारण शिवसेनेच्याबाबतीतही हे असंच घडलं होतं.