मुंबई– महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील राम लल्लाच्या प्रतिष्ठापणेचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. तसेच निमंत्रण मिळण्याची शक्यता कमी आहे. अशात राम मंदिराचे प्रमुख पुजारी अचार्य सत्येंद्र दास यांनी मोठं वक्तव्य केलंय. २२ जानेवारीला राम मंदिराच्या लोकार्पणासाठी फक्त रामाच्या भक्तांना निमंत्रण देण्यात आले आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.(Ram Temple chief priest Acharya Satyendra Das on shivsena Uddhav Thackeray no invite claim)
जे रामाचे भक्त आहे त्यांनाच निमंत्रण देण्यात आले आहे. भाजप राम मंदिराच्या नावावर राजकारण करत आहे असं म्हणणं अत्यंच चुकीचे आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वत्र आदर होत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात मोठं काम करुन दाखवलं आहे. हे काही राजकारण नाही. ही भक्ती आहे, असं प्रमुख पुजारी म्हणाले आहेत. ते एएनआयशी बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला होता. भाजप राम मंदिरावरुन राजकारण करत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उदात्तीकरण केलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला होता. ठाकरे असंही म्हणाले होते की राम मंदिराचे उद्धाटन होतंय याचा आनंद आहे. माझ्या वडिलांनी राम मंदिरासाठी लढाई दिली होती.
आचार्य सत्येंद्र दास यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली. संजय राऊत म्हणतात की प्रभु राम देखील भाजपकडून निवडणूक लढतील. पण, हे वक्तव्य किती हस्यास्पद आहे, असं ते म्हणाले. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप राजकीय पोळी भाजत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राम यांचा वापर करत आहे, असं टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले होते.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी जाणार नसल्याचं याआधीच जाहीर केलं आहे. भाजपला फायदा होईल अशा प्रकारचं कोणतंही कृत्य करण्यास तृणमूल तयार नसल्याचं चित्र आहे. दरम्यान, राम लल्लाची प्रतिष्ठापणा २२ जानेवारी रोजी होणार आहे. यासाठीचा कार्यक्रम १६ जानेवारीपासूनच सुरु होणार आहे. माहितीनुसार, तब्बल ८ हजार मान्यवरांना सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.