IND vs AUS 2nd T20I Match: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाच टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेचा दुसरा सामना तिरुवनंतपुरममध्ये सुरु आहे. या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी २० षटकात धावांचा वर्षाव केला. सामन्यात टीम इंडियाच्या ऋतुराज गायकवाड, ईशान किशन आणि यशस्वी जयस्वालने तुफान फटकेबाजी केली. टीम इंडियाने २० षटकात ऑस्ट्रेलियाला 236 धावांचं आव्हान दिलं आहे.
टीम इंडियाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. टीम इंडियाच्या यशस्वी जयस्वाल, ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाडने अर्धशतक ठोकले. तर ऋतुराजने टीम इंडियासाठी सर्वाधिक ५८ धावा चोपल्या. टीम इंडियाने २० षटकात ४ गडी गमावून २३५ धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियासाठी एलिसने २ गडी बाद केले.
यशस्वी जयस्वालने टीम इंडियाला धमाकेदार सुरुवात करून दिली. टीम इंडियाला पहिला धक्का ७७ धावांवर बसला. यशस्वी जयस्वालने २५ चेंडूत ५३ धावा केल्या. यशस्वी बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशनने ८७ धावांची भागीदारी रचली.
ईशान किशनने ३२ चेंडूत ५२ धावा चोपल्या. तर कर्णधार सूर्यकुमार यादव १० चेंडूत १९ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर सलामीवीर ऋतुराज गायकवाड ४३ चेंडूत ५८ धावा करून बाद झाला. रिंकू सिंहनेही तुफानी खेळी खेळली. रिंकूनेही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पिसे काढली. रिंकूने ९ चेंडूत ३१ धावा कुटल्या. तर तिलक वर्मा २ चेंडूत ७ धावा करून नाबाद राहिला.