Jalgaon News: बऱ्हाणपूर – अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण हे आधीच्या मूळ मार्गानेच म्हणजे रावेर व सावदा शहरातून करण्यात यावे, या मागणीसाठी खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची गुरुवारी (ता. १४) दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान भेट घेतली.
बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या दर्जोन्नती व चौपदरीकरणासाठी गेल्या काही वर्षांपासून खासदार खडसे केंद्र व राज्य स्तरावर संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करत आहेत.
चौपदरीकरणाचा डीपीआर तयार करण्यात आला असून, भूसंपादनासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत ७ नोव्हेंबर रोजी आदेश देण्यात आले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील गावांचा समावेश आणि रावेर व सावदा शहरे चौपदरीकरण प्रक्रियेत वगळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.
त्यामुळे स्थानिकांच्या मागणीनुसार मुक्ताईनगर तालुक्यातून हा मार्ग न काढता का, असा सवाल खासदार खडसे यांनी श्री. गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन मागणी व निवेदन दिले.
यासंदर्भात खासदार खडसे यांनी भ्रमणध्वनीवरून ‘सकाळ’शी बोलताना गडकरींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती दिली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नागपूर आणि भोपाळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणार असून, त्यात आम्ही खासदारही उपस्थित राहणार आहोत.
हा महामार्ग सावदा, रावेर शहरातून किंवा या शहरांजवळून आणि पूर्वीप्रमाणेच तालुक्याच्या पूर्व भागातून गेला पाहिजे, अशी ठाम भूमिका या बैठकीत घेणार असल्याचे त्यांनी सकाळशी बोलताना सांगितले.