Coconut Water Benefits : आपल्या आरोग्यासाठी नारळ पाणी अतिशय फायदेशीर आहे. नारळ पाण्याला ‘अमृतपेय’ असे ही म्हटले जाते. वयोवृद्धांपासून ते लहानांपर्यंत सर्वांनाच नारळ पाणी प्यायला आवडते. नारळ पाणी आपल्या शरीराला आराम देण्यासोबतच ऊर्जा मिळवून देण्याचे काम करते.
त्यासोबतच आपले शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी नारळ पाणी लाभदायी आहे. नारळाच्या पाण्यात पोटॅशिअम आणि पोषकघटकांचे विपुल प्रमाण आढळून येते. यासोबतच, नारळ पाण्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण ही कमी आढळून येते.
मात्र, नारळ पाणी तुम्ही योग्य वेळी पिणे देखील तितकेच महत्वाचे आहे. आज आपण नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? आणि नारळ पाण्याचे फायदे कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत.
नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
सकाळी रिकाम्या पोटी पिणे
सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्यामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. नारळ पाण्यामध्ये लॉरिक ॲसिड असते, जे आपल्या शरीराची चयापचय क्रिया वाढवण्याचे काम करते. यासोबतच वजन कमी करण्यासाठी देखील नारळ पाणी फायदेशीर आहे. विशेष म्हणजे डिहायड्रेशन आणि बद्धकोष्ठता यांच्या विरोधात लढण्यासाठी गर्भवती महिलांना देखील नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
जेवणापूर्वी की जेवणानंतर
जेवणापूर्वी नारळाचे ताजे पाणी प्यायल्यामुळे आपले पोट देखील भरलेले राहते. ज्यामुळे, तुम्हाला फार वेळ भूक लागत नाही आणि जास्त खाण्यापासून प्रतिबंध होतो.
नारळ पाण्यात मूळात कॅलरीज कमी प्रमाणात असतात. ज्यामुळे, वजन नियंत्रित ठेवता येते. नारळ पाणी प्यायल्याने आपल्या शरीराची पचनक्षमता सुरळीत राहण्यास मदत होते. त्यामुळे, शक्यतो जेवणापूर्वी नारळ पाणी प्यावे.
वर्कआऊटच्या आधी की नंतर
नारळ पाणी हे एक नैसर्गिक स्पोर्ट्स ड्रिंक आहे. जे आपल्या शरीराला केवळ हायड्रेट ठेवत नाही तर भरपूर ऊर्जा देखील देते. शक्यतो वर्कआऊट केल्यानंतर नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
कारण, वर्कआऊट केल्यानंतर आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स हे नष्ट झालेले असतात आणि शरीर थकल्यासारखे होते. त्यामुळे, वर्कआऊट केल्यानंतर नारळ पाणी प्यायल्याने आपल्याला ऊर्जा ही मिळते आणि शरीराला इलेक्ट्रोलाईट्स ही मिळतात.