याबद्दल सरकारने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
मुंबई : मुंबई प्रदुषणाच्या बाबतीत आज मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, सरकार प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली फक्त इव्हेंटबाजी करीत असल्याची टीका काँगेसने केली आहे. आयआयटीबी व राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिक संस्थेच्या अहवालानुसार, ७१ टक्के प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात सुरू असलेले प्रकल्प आणि विकासकामे यांच्यामुळे होत आहे. याबद्दल सरकारने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
राज्याची धोरण तयार करणारे प्रदूषणाच्या बाबतीत योग्य निर्णय घेत नसतील तर सर्वसामान्य जनतेची काय परिस्थिती होईल. तसेच दिल्लीत प्रदूषणामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती मुंबईवर येणार का? याबाबत ताबडतोब निर्णय घेणे आवश्यक असल्याची मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केली.
सरकार इवेन्टबाजी करण्यामध्ये फक्त चांगले आहे. ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी धारावीला भेट दिलीत तेव्हा डीप क्लीनच्या माध्यमातून पाण्याची फवारणी करून त्यांनी रस्ता साफ केला. पण हा रस्ता मुख्यमंत्री येणार म्हणून रात्री अडीच वाजताच साफ करण्यात आला होता. सरकार फक्त आपल्या कार्यक्रमांच्या दिवशी साफसफाईचा देखावा करते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिकडे कचरा साचतो. तो साफ करायची जबाबदारी कोणाची? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला.
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रस्ते तयार करून देण्याची मागणी वर्षा गायकवाड यांनी केली होती. त्यावेळी, आम्ही येत्या सहा महिन्यात मुंबईत चारशे किलोमीटरपर्यंत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करू, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण आज दोन वर्ष झाली तरी रस्त्यांची कामे झालेली नाहीत. ६८० कोटीच टेंडर पास होऊन, रस्त्यांची अवस्था अजुनही जैसे-थेच आहे. हे टेंडर रद्द झाल्यावर आता ते पुन्हा रिटेंडर कधी होणार? असा प्रश्न विचारून, मुंबईला वेठीस धरण्याचं काम केले असल्याची टीका सरकारवर केली आहे.